माता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News Today: बाळ रडत असेल तर आईचा जीवही कासावीस होतो. रडणारं बाळ शांत करण्यासाठी आई हरतऱ्हेचे प्रयत्न करत असते. मात्र, झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे. 

आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, महिलेला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. गोलगो या गावातील ही घटना आहे. 

निजामुद्दीनचे सहा वर्षांपूर्वी अफसाना खातून या महिलेसोबत लग्न झाले होते. निजामुद्दीन मुकबधिर आहे. लग्नानंतर त्याला दोन मुलं झाली. मोठा मुलगा चार वर्षांचा आहे तर लहान मुलगा दोन वर्षांचा आहे. गुरुवारी दोघा पती-पत्नींमध्ये एका क्षुल्लक कारणांवरुन वाद झाले. त्यानंतर तिने पतीला एका खोलीत बंद करुन ठेवले आणि ती बाहेरच्या खोलीत घेऊन बसली होती. तिने दरवाजा बंद ठेवला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एका व्यक्तीशी फोनवर बोलत होती. त्याचवेळी तिचा दोन वर्षांचा मुलगा रडत होता. पण त्याला शांत करण्याऐवजी महिला संतापली आणि तिने पोटच्याच लेकाची गळा दाबून हत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला लहान मुलासोबत घरातील आतल्या खोलीत होती. तिने तिच्या पतीला जेवणासाठी बोलवले पण दरवाजा मात्र खोलला नाही. बऱ्याचवेळाने तिने दरवाजा उघडला जेव्हा तिचा पती आतल्या खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं की मुलगा निपचित पडला होता. त्यानंतर त्यांने बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितले. कुटुंबीय लगेचच धावत खोलीत गेले अन् मुलाला घेऊन रुग्णालयात गेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

आरोपी महिला अफसाना खातून हिने दिलेल्या कबुलीजबाबानुसार, तिचे पतीसोबत वाद झाले होते. रागात ती फोनवर बोलत असताना मुलगा रडायला लागला. त्यामुळं तिने रागात त्याला मारहाण केली आणि तिचा धक्का लागला. धक्का लागून तो बेडवरुन खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, महिलेच्या सासऱ्यांनी ती खोटं बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे उत्तरप्रदेश येथे माहेर आहे. तिथून परतल्यापासून ती सतत कोणासोबत फोनवर बोलत असायची. त्यातूनच तिने मुलाचा गळा दाबून खून केला.

Related posts